नायगावच्या रानसुगाव येथील नम्रता जाधव या शेतकरी कन्येची भारतीय वायू सेनेत उड्डाण अधिकारी पदी निवड.
नायगाव/नांदेड-
जिद्द,चिकाटी व मेहनत यांचा त्रिवेणी संगम करीत ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील रानसुगाव ता.नायगाव खै.जि.नांदेड येथील आनंदराव तुळशीराम जाधव यांची कन्या कु.नम्रता उर्फ दीपाली आनंद जाधव हिची भारतीय वायू सेनेत (फ्लाईंग ऑफिसर) उड्डाण अधिकारी या पदासाठी निवड झाली असून तिने यश संपादन केलेल्या यशाबद्दल तिचे रानसुगाव व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
कु.नम्रता उर्फ दीपाली आनंद जाधव हीचा जन्म रानसुगाव ता.नायगाव खै.जि.नांदेड या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला. वडील देशसेवेत सैनिक असल्याने वडिलांसोबत असणारे अधिकारी यांची छायाचित्रे पाहून इयता चौथी पासूनच नम्रताला अधिकारी होण्याची आवड निर्माण झाली. नम्रताचा “फ्लाइंग ऑफिसर” उड्डाण अधिकारी होण्याचा मानस सुरुवाती पासूनच होता परंतु तिच्या जीवनात अनेक संकट आली. त्या संकटांचा सामना करीत नम्रता उर्फ दीपालीने वायू सेनेत उड्डाण अधिकारी या पदावर अखेर नियुक्ती मिळवलीच.त्याबद्दल तीचे आई बाबा,काका-काकू व गावातील सर्व गावकऱ्यांच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले आहे.
‘कुळी कन्या पुत्र,होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे जिवा’या संत वचना प्रमाणे सौ. रुक्मिणी बाई व आनंदराव जाधव या आई वडिलांना आपली कन्या भारतीय वायू सेनेत अधिकारी झाल्याचे पाहून खूप आनंद झाला आहे.तिचे काका माजी चेअरमन संभाजी पाटील जाधव यांना ही हा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.आनंदराव हे सात भावाच्या कुटुंबातील व्यक्तिमत्व असून त्यांनी जिद्दीने शिक्षण घेऊन भारतीय सैन्यात नोकरी स्वीकारली व आपल्या तीन कन्या व एक पुत्ररत्न यांना शिक्षणासाठी पुणे पाठवले. यातील तिसऱ्या क्रमांकाची कन्यारत्न नम्रता ही सन 1996 मध्ये शेतकरी कुटुंबात जाधव परिवारात जन्माला आली. तिचे वडील थल सेनेतून सेवा निवृत झाले असून तिला आई, दोन बहिनी व एक भाऊ असे घरातील सदस्य आहेत.तिचे लहानप्नापासूनचे आर्मी नेव्ही किंवा एअर फोर्स मध्ये जाण्याची व देशसेवा करण्याची तिची इच्छा होती. पाचवीला असतानाच ‘सी कैडीट कोर’ या आर्थल जल सैनिकाची ट्रेनिंग तिने घेतली. इंजिनिअरिंग चालू असतानाच एन.सी.सी.मध्ये भाग घेतला व अनेक पदकं मिळवले. तिला नृत्य कला ही अवगत आहे. तसेच तिची कामगिरी फार मोठी होती की त्यांनी एन.सी.सी. मध्ये असताना २६ जानेवारी २०१७ मध्ये गणतंत्र दिवसाच्या दिवशी दिल्लीत राजपथवर संचलन पदाचे सूत्रं हाती घेतले होते. तसेच कझाकीस्थान येथे गेलेल्या संपूर्ण भारतीय तुकडीचे नेतृत्व ही केले.
नम्रता हीने अतिशय मेहनतीने अभ्यास केला व इंजिनीअरिंग मध्ये उच्च प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाली. त्याच बरोबर तिने काऊंटर टेरेरीजम स्टडीज मध्ये डिप्लोमा व एमबीए (management studies) करत असताना सैन्यात अधिकारी होण्याची तयारी सुरू ठेवली.शेवटी तिच्या अथक परिश्रमाला यश मिळाले असून तिची भारतीय वायू सेनेत उड्डाण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.तिच्या या यशाबद्दल नायगांव माणिक नगर येथे वैष्णव कुंज या निवासस्थानी पत्रकार बाळासाहेब पांडे मांजरमकर व परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी माजी चेअरमन संभाजी पाटील जाधव, वडील आनंदा पाटील जाधव आदी उपस्थित होते.